धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक…!
नाना पटोले बसलेत राष्ट्रीय महामार्गावर : तासभर महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लागल्यात लांबच लांब रांगा


भंडारा : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन काँग्रेसच्या वतीने आज भंडाऱ्यात महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घालताना नाना पटोले यांनी सरकारला खरमरीत इशारा देत राष्ट्रीय महामार्ग वर ठिय्या आंदोलन केलं सुमारे तासभर हे आंदोलन करण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या दुथर्पा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर हे स्वतः आंदोलनस्थळी येऊन नाना पटोले यांच्याशी चर्चा केली आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. भंडारा शहरातील शास्त्री चौकातील हुतात्मा स्मारक येथून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा भंडारा शहराच्या प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात धडकला. या मोर्चा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा प्रभारी नंदा पराते, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, माजी आमदार अनिल बावनकर, सभापती मदन रामटेके, सभापती रमेश पारधी, सभापती स्वाती वाघाये, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मधुकर लिचडे, भरत खंडाईत, काँग्रेस कमिटीच्या सर्व तालुका व शहर अध्यक्ष, फ्रंटल व सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष प्रमुख्याने उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसच्या नेत्यांची समायोजित भाषणे झालेत. यावेळी नाना पटोले यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या राज्य सरकारने तातडीने निकाली काढाव्या, अन्यथा राज्यभरात काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून दिला. दिवाळी तोंडावर असतानाही धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे, असे असताना हे सरकार मात्र एन्जॉय करत असल्याचा घनाघात नाना पटोले यांनी केला आहे.
भाषनानंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वात मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना अचानकपणे सर्वांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वतः राष्ट्रीय महामार्गावर बसलेत. जोपर्यंत जिल्हाधिकारी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत उठणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिल्याने तब्बल अर्धा तासानंतर जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले. यावेळी नाना पटोले यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने तब्बल तासभरानंतर महामार्ग सुरू झाला. दरम्यान, प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.

चौकट
या मुद्द्यांना घेवून काढला महा जन आक्रोश मोर्चा
- जिल्हयात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, सर्व प्रकारच्या पिकविम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी, शासकिय धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून धानाला ७०० रूपये प्रती क्विंटल बोनस देण्यात यावा, जंगली जानवरांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी विषेश पिकविमा लागु करावा, कृषीपंपाना सलग १२ तास विज देण्यात यावी, यशवंतराव चव्हाण व ओबीसी घरकुल योजनेचे लाभार्थाना तात्काळ लाभ देण्यात यावा, ओबीसी विद्यार्थाचे वसतीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे, घरगुती वापरातील गॅस, डिझेल व पेट्रोलच्या किंमती कमी कराव्या, नैराश्येत अडकलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी तातडीने नौकर भरती सुरू करावी, शहरातील गटार योजनेमुळे व ग्रामिण भागातील पावसामुळे खराब झालेले रस्ते तात्काळ दुरूस्त करावे, राज्यातील जनतेची जातनिहाय जनगनना करून सर्व प्रकारच्या मागासवर्गियांना आरक्षण लागू करावे, अमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसचे त्या पदार्थांचा नायनाट करावा, संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचे ६ महिण्यापासुन थकित पेन्शन तात्काळ देण्यात यावे,मोहाडी नगर पंचायत ने वाढवलेला घरभाडे कमी करावे, बिटीबी मार्केट येथील दबंगशाही दूर करून शेतकरी व ग्राहकांना न्याय द्यावा.या मागण्यांना घेवून मोर्चा काढण्यात आला.
