शिक्षक दिनी घडयाळी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे भिक मांगो आंदोलन



राज्यशास्त्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुमित पवार यांचा भंडारा जिल्हा दौरा व लढा
संजीव भांबोरे
भंडारा ( ऑल इंडिया प्रतिनिधी) सोमवार दि ५ सप्टेंबर शिक्षक दिन खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या न्याय- हक्काचा दिवस मानला जातो. मात्र खरच खेदाने असे म्हणावे लागते की, शिक्षकांसाठी न्याय- हक्काचे दिवस राहलेत का? मग ते प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक असो!
एकीकडे आपण शिक्षकांना राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार मानतो. शिक्षक हा देशाचा कणा मानला जातो. मनुष्य शिक्षित झाला तरच त्याला त्याच्या प्रगतीचे मार्ग दिसतील. पर्यायाने मनुष्याची प्रगती झाली म्हणजे देशाची प्रगती दूर नाही. पण आज संपूर्ण देशात व राज्यात शिक्षणाची अवस्था बिकट झाली आहे. आमचे अनेक बांधव उपाशी पोटी विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने जीव ओतून शिकविण्याचे काम करतात. पण ते किती दिवस रिकाम्या पोटी अध्ययन-अध्यापनाचे काम करु शकतील याचा समाज स्तरावर,शासन स्तरावर विचार करण्याची वेळ आली आहे. शिक्षणासाठी आज आपण असेही दिवस आणले आहे की, त्यांना एका तासाकरिता माध्यमिक शिक्षकांना ४३₹, ५३₹ रुपये व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांकरिता ७२₹ रुपये वेतन दिले जाते. हे व्यवहारीक दृष्टीने कितपत योग्य आहे. सामान्य मोल-मजुरी करणाऱ्या माणसांना साधारणपणे ५०० रु. रोज मिळतो. पण बौद्धिक काम करणाऱ्या आमच्या शिक्षकांना घडाळी तासिकेवर दिले जाणारे वेतन फारच तुटपुंजे आहे. शासन या गुरुजनांची आर्थिक दृष्ट्या चेष्टा तर करत नाही ना? काय म्हणावे या निर्लज्ज अशा धोरणाबद्दल!
हे धोरण बदलून शासनाने त्यात सुधारणा केली पाहिजे. या संदर्भात काही शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक कधीही शासनाकडे हा मुद्दा लावून धरणार? आणि काहींनी लावला तरी या लठ्ठपगारी आमदारांना,व मंत्र्यांना खरंच उपाशी पोटी शिकविणाऱ्या शिक्षकांच्या भावना कळतील का ?
एक दिवस शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवुन शिक्षक दिन बैल पोळ्या सारखा साजरा केला जातो. या कृतिने खरच शिक्षकांचे प्रश्न सुटणार आहे का?
म्हणून आजच्या या शिक्षक दिनी अस्थायी घड्याळी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना “भिक मांगो आंदोलन “करण्याची वेळ आली आहे.
या आंदोलनात नागपूर विभाग राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषद, पालक प्रा.प्रमोद कारमोरे, नागपूर विभाग महासचिव प्रा.पदमाकर सावलकर,प्र.अध्यक्ष भंडारा जिल्हा प्रा.कमलकुमार सोनवणे आदी व घड्याळी तासिकांवर काम करणारे शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने आमच्या मागणीचा विचार करुन घड्याळी तासिकाचे वेतन वाढवुन द्यावे. व शिक्षकांवर होणारा आर्थिक अन्याय थांबवावा ही माफक अपेक्षा शासनाकडे आहे. असे आंदोलन कर्ते शिक्षकांची भिक मांगो आंदोलनाद्वारे मागणी केली आहे.या आंदोलनाचा लढा यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्रा.सुमित पवार व त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारी व कार्यकर्ते
यांनी प्रयत्न केले.

